साईमत मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग आणि चँम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (ईडीएफ पॉवर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड समूह) यांच्यात पुणे व रायगड जिल्ह्यात पिंपळपाडा–सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या प्रकल्पाद्वारे राज्यात जलविद्युत क्षेत्रात मोठा टप्पा साधला जाणार आहे. आतापर्यंत मंजूर झालेल्या 55 उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे महाराष्ट्रात 78,215 मेगावॅट वीज निर्मिती, अंदाजे ₹4.17 लाख कोटींची गुंतवणूक आणि सुमारे 1.28 लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.
सामंजस्य कराराच्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव श्री. दीपक कपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, सचिव श्री. संजय बेलसरे, महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुरीएक सर्वन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, “जलविद्युत प्रकल्प राज्यातील हरित उर्जा निर्मितीला चालना देतील तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देतील. रोजगार निर्माण आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, “पिंपळपाडा–सावळे प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व नियोजन आणि मार्गदर्शन सरकारकडून केले जाईल. हा प्रकल्प राज्यातील ऊर्जा सुरक्षिततेसाठी तसेच शाश्वत विकासासाठी मीलाचा दगड ठरणार आहे.”
या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्यातील जलविद्युत क्षेत्रात नवीन गती मिळणार असून, ऊर्जा निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक रोजगार उपलब्धतेसाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
