साईमत, जळगाव : प्रतिनिधी
भरारी फाउंडेशनतर्फे येत्या गुरुवारी, २५ जानेवारीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचे भूमिपूजन सोमवारी, २२ जानेवारी रोजी सायंकाळी उद्योगपती रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अयोध्या येथील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून महोत्सवाच्या स्थळी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ते नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. भूमिपूजननिमित्त श्रीरामाची ‘महाआरती’ झाली. यावेळी क्षत्रिय वर्मा समाजातील कलाकारांनी सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले.
सागर पार्क येथे आयोजित महाआरती व भूमीपूजनाच्या कार्यक्रमात उद्योगपती रजनीकांत कोठारी, भालचंद्र पाटील यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या यंदाच्या ९ व्या वर्षाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बाळासाहेब सूर्यवंशी, रत्नाकर पाटील, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, अनील काकंरीया, ॲड. के .बी वर्मा, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, निवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनील भोकरे, अमर कुकरेजा, कुशल गांधी, सुभाष जैन, विनोद ढगे, सचिन महाजन, अक्षय सोनवणे, सागर पगारिया, विक्रांत चौधरी, दीपक विधाते, दुर्गेश आंबेकर आदी उपस्थित होते.
महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. खान्देशातील खाद्य परंपरा तसे सांस्कृतिक चळवळीला चालना देणाऱ्या महोत्सवात पोवाडा, लावणी या लोककलेसोबत मराठी संस्कृतीचा फॅशन शो यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रंगणार आहे. तसेच महिला बचत गटांनी याठिकाणी स्टॉल आरक्षित केलेले आहेत. २५ पासून महिलांसाठी कुकरी शो, रांगोळी स्पर्धा व शाळा, महाविद्यालयातील स्पर्धक कलावंत महोत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. २५ ते २९ जानेवारी पर्यंत महोत्सव मनोरंजनासाठी खुला असेल, असे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.