साईमत, लातुर : प्रतिनिधी
राजस्थानच्या कोटा या ठिकाणी देशभरातले विद्यार्थी परीक्षांच्या तयारीसाठी येत असतात. रविवारी दुपारी नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील अविष्कार कासले (१७ वर्षे) हा विद्यार्थी कोटा या ठिकाणी शिक्षण घेत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उजना गावातल्या सगळ्यांनाच धक्का बसला आहे.अविष्कारचे आई आणि वडील हे दोघंही शिक्षक आहेत. अहमदपूरमध्ये ते वास्तव्य करतात. यांचा मोठा मुलगा आणि अविष्कारचा मोठा भाऊ हैदराबादमध्ये शिक्षण घेतो. मोठ्या मुलाचं शिक्षणही कोटामधून पूर्ण झालं आहे. त्यानंतर अविष्कारही कोटा या ठिकाणी शिक्षणासाठी गेला होता. अविष्कारने आत्महत्या का केली ? हे अद्याप समोर आलेलं नाही. अविष्कारने दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास जवाहर नगर कोिंचग क्लासच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. अविष्कारने उडी मारल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचण्याआधीच अविष्कारने जीव सोडला. अविष्कारने आत्महत्या केल्याची माहिती मिळातच त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. सोमवारी रात्री उशिरा अविष्कारचा मृतदेह त्याच्या मूळ गावी आणण्यात आला.
चार तासात दुसरी आत्महत्त्या
अविष्कारच्या आत्महत्येच्या चार तासानंतर कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आदर्श राज (१८ वर्षे) असे या विद्यार्थ्याचं नाव आहे. आदर्शने रविवारी संध्याकाळी सात वाजता कुन्हाडी येथील आपल्या घरात फाशी घेत आत्महत्या केली. आदर्शची बहीण आणि चुलत भाऊ संध्याकाळी साडेसात वाजता फ्लॅटवर पोहचले तर दरवाजा आतून बंद होता. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला ,त्याव्ोळी लटकलेल्या अवस्थेत होत्या. आदर्शला लगेच खाली उतरवण्यात आले परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याने प्राण सोडले. कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. पण आता कोटाच्या सर्व कोिंचग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
वारंवार परीक्षांमुळे ताण
कोटात क्लासेसचं प्रेशर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर येत असते. दर आठवड्याला होणारी परीक्षा, महिन्याची होणारी परीक्षा अशी तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. मग त्यात योग्य गुण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरील ताण वाढत जातो. यातून या ठिकाणी शिकायला येणारे विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं समोर येत आहे.