बहिणाबाई-सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनात विविध परिसंवादासह कवी संमेलन, पुरस्कार वितरण उत्साहात
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील लोक बोलीतून संवाद साधण्यात संकोच करतात. बरे ते प्रमाण मराठीही व्यवस्थित बोलत नाहीत. त्यांच्या तोंडी येणारे वाक्यही इंग्रजी वळणाचे आहे. तेव्हा ग्रामीण लोकच बोलीभाषेचे तारणहार आहेत. ग्रामीण बोलीतून व्यक्त होणाऱ्या माय ‘बहिणाबाईंचा’ आम्हाला सार्थ अभिमान राहील, असे प्रतिपादन अठराव्या बहिणाबाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. फुला बागुल यांनी केले. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पवन चारिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट, कविवर्य स्व.पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था, युवा विकास फाउंडेशन यांच्या सौजन्याने कविवर्य स्व.पुरुषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बहिणाबाई सोपानदेव खान्देश खान्देस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी, १३ जुलै रोजी उत्साहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनात जळगावसह धुळे, नंदुरबार, वर्धा जिल्ह्यातील कवींनी आपल्या कविता सादर केल्या. बोलीभाषेतील कवितांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
संमेलनाचे सकाळी आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विविध भजने, अभंगातून पालखी, दिंडी सोहळा साजरा झाला. ग्रंथ दिंडी घेऊन मान्यवरांनी परिसरात फेरी काढली.त्यानंतर उद्घाटन सत्रात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनासह दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई – सोपानदेव चौधरी- मालतीकांत जीवनगौरव पुरस्कार २०२५ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार राजू बाविस्कर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते खान्देशातील कवी-कवयित्रींच्या स्वलिखित कवितांचे प्रदर्शन ‘पोस्टर पोएट्री’चे उद्घाटन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
मंचावर संमेलन अध्यक्ष डॉ. फुला बागुल, उद्घाटक आ. सुरेश भोळे (राजूमामा), प्रमुख पाहुणे म्हणून खा. स्मिताताई वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक अमित काळे, माजी संमेलनाध्यक्ष संजीवकुमार सोनवणे उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून पुष्पाताई साळवे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे तसेच सेवानिवृत्त डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड, लेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रवीण भोळे, बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. उत्तम सुरवाडे यांनी साहित्य संमेलन भरवून चिरंतन ठेवणाऱ्या डॉ. विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे यांच्या कार्याचा गौरव करून दिला.
अहिराणी भाषा टिकविणे सर्वांचे कर्तव्य
ज्याला शब्द सुचतात तोच साहित्यिक असतो. यासाठी अहिराणी भाषा टिकविणे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार याठिकाणच्या साहित्यिकांनी एकत्र येऊन मोठ्या स्वरूपात अहिराणी भाषेला पुढे यायला हवे, अशी अपेक्षा खा.स्मिताताई वाघ यांनी संमेलनात व्यक्त केली. शिक्षण कितीही असले तरी आपली संस्कृती जोपासण्यात आली पाहिजे. पुरुषोत्तम नारखेडे उपाख्य कवी मालतीकांत यांनी सुरू केलेला मराठी साहित्य संमेलनाचा प्रवाह आज अठराव्या पायरीवर येऊन पोहोचला आहे, त्याचा आनंद आहे. अशा संमेलनातूनच आपल्या साहित्य आणि संस्कृतीचे जगाला ज्ञान होते, असे गौरवोद्गार आ.सुरेश भोळे यांनी काढले.
विविध सत्रात कवींनी व्यक्त केल्या भावना
संमेलनात दुपारच्या सत्रात “आणि ‘ती’ लिहिती झाली…” विषयावर परिसंवाद कार्यक्रम झाला. त्यात प्रा.संध्या महाजन यांनी तिच्या ‘ती’ बोलू लागलीपासून ‘ती’ लिहू लागली इथवरचा प्रवास अतिशय विलोभनीय अंदाजात मांडला. पौर्णिमाताई यांनी तिच्या वेदनेतून आर्त कविता आणली. सत्राचे अध्यक्ष ॲड. विलास मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन विजय लुल्हे यांनी मानले. त्यानंतर चौथ्या सत्रात कथाकथनात प्रा. गोपीचंद धनगर, संस्कृती पवनीकर यांनी सहभाग नोंदविला. संस्कृतीने डॉ. मंजुषा पवनीकर लिखित कथाकथन विषयावरील ‘ते दहा नि’ कथा सादर केली. सत्राच्या अध्यक्षस्थानी रंगकर्मी दिलीप जाने होते. काळ बदलत असला तरीही कथाकथन आजही लोकप्रिय आहे. कथाकथन विद्यार्थी विकासात पूरक आहे, असे दिलीप जाने यांनी नमूद केले. सूत्रसंचालन तथा आभार प्रकाश पाटील यांनी मानले. त्यानंतर ‘बालकांचे भावविश्व आणि साहित्य सहवास’ सत्रात बालकांची वाचन संस्कृती वाढणे हा बोलण्याचा विषय नाही. तर तो कृतीत आणण्याचा विषय आहे, असे सांगवी खुर्दतील जि.प.शाळेच्या शिक्षिका जयश्री काळवीट यांनी सांगतिले. यासह सत्रात सुशीलकुमार शिंदे, रवींद्र शिंदे यांनीही सहभाग नोंदविला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका माया धुप्पड होत्या. त्या म्हणाल्या की, खान्देच्या साहित्य चळवळीत बहिणाबाई चौधरी, सोपानदेव, साने गुरूजी यांचा बहुमूल्य वाटा आहे. साहित्य चालवत जोपासण्याचे काम विलास नारखेडे करत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सत्राचे सूत्रसंचालन तथा आभार सुनीता येवले यांनी मानले.
विविध विषयांवर झाले कवितांचे सादरीकरण
कवी संमेलनात डॉ.अ.फ.भालेराव, ज्योती राणे, किशोर नेवे, शैलजा करोडे, हरुन पटेल, रमेश धुरंधर, प्रवीण लोहार, आशा सांळुखे, ॲड. मुकुंद जाधव, डॉ. संजय पाटील, ज्योती वाघ, संतोष साळवे, मंजुषा पाठक, संध्या भोळे, शितल पाटील, मनोहर तेजवाणी, प्रकाश पाटील, प्रफुल्ल पाटील, भीमराव सोनवणे, डी.डी.पाटील, जयश्री काळवीट, सुनिता येवले, गंगा सपकाळे, निंबा बडगुजर, विजय लुल्हे, इंदिरा जाधव, चित्रा पगारे, शहानूर तडवी आदी कवींनी विविध विषयांवर कवितांचे सादरीकर करून उपस्थितांची मने जिंकली तर समारोपीय कविता प्रा. संध्या महाजन यांनी सादर केली.
असे आहेत संमेलनातील पारीत ठराव
संमेलनात विविध ठराव मांडण्यात आले. ते ठराव मंजूर केले आहे. बदलत्या काळात मराठी भाषा, भाषिक व साहित्य क्षेत्रात वाढ होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. साहित्य व कवी संमेलनासाठी संख्यात्मक वाढ होण्यापेक्षा गुणात्मक वाढ होण्याचाही विचार व्हावा. शासनातर्फे साहित्य, काव्य क्षेत्रातील निधन झालेल्या स्मुतीना श्रद्धांजली वाहण्यात यावी. नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यावी, त्याच्यातील कर्मचाऱ्यांना चांगले वेतन द्यावे. पुस्तके खरेदी-विक्री करतांना व छपाईसह कागद खर्चात जीएसटीमधून वगळावे. मराठी भाषिक शाळांना शासकीय योजनेत प्राधान्य द्यावे. राज्यातील विविध बोलीभाषा संवेदना द्यावी. बोलीभाषा विकास संख्या स्थापन करावी. साहित्यिकासह काव्य क्षेत्रातील पुरस्कारांच्या संख्येत वाढ करावी, असे ठराव संमेलनात पारीत करण्यात आले.
पुरस्कार वितरणासह कवींना सहभागाचे सन्मानपत्र प्रदान
संमेलनातील कवी संमेलन खान्देशातील प्रतिनिधीत्व कारणाने आणि ज्येष्ठ कवींसोबत नव्या पिढीतील कवींना व्यासपीठ देणारे आहे, असे प्रतिपादन कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बी. एन. चौधरी यांनी केले. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरणासह कवींना सहभागाचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. साहित्य संमेलनात खान्देशातील बहुसंख्येने साहित्यिक, कवी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निमंत्रक डॉ. विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, तुषार वाघुळदे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे, आयोजक रघुनाथ राणे, डॉ. संजय पाटील, प्रा. संध्या महाजन, ज्योती राणे, साधना लोखंडे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.