वैभवी बगाडेसह परशुराम विद्यालयाने गाजवला ‘पोवाडा’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
बालरंगभूमी परिषदेतर्फे संपूर्ण राज्यभरात अध्यक्ष ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून “इतिहास महाराष्ट्राचा– श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक” उपक्रमाचे आयोजन केले होते. राज्यभरातील २६ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतून सात हजारांहून अधिक बालकलावंतांपैकी निवडलेल्या सर्वोत्कृष्ट आणि उत्कृष्ठ विजेत्यांची महाअंतिम फेरी गेल्या १३ व १४ सप्टेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात पार पडली. महाअंतिम फेरीत जळगाव शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयाने समूह गटात विशेष लक्षवेधी पुरस्कार पटकावला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साभिनय सादर केलेल्या पोवाड्याला सन्मान मिळाला. त्याचबरोबर वैभवी बगाडे हिने सादर केलेल्या पोवाड्यालाही एकल गटात विशेष लक्षवेधी पुरस्कार मिळाला.
यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के-सामंत, कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष ॲड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दीपाली शेळके, आसिफ अन्सारी, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, अनंत जोशी, सीमा यलगुलवार, सुजय भालेराव, शिवाजी शिंदे, वैभव जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते प.वि. विद्यालयाच्या संघाला व वैभवी बगाडेला पारितोषिक प्रदान करण्यात आले.
बालकलावंतांचा यांनी केला गौरव
स्पर्धेचे परीक्षक म्हणून लोकशाहीर नंदेश उमप, सिने-नाट्य अभिनेते सुनील गोडसे, शिवशाहीर प्रवीण जाधव यांनी काम पाहिले. जळगावच्या बालकलावंतांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य दर्शन गुजराथी, नेहा पवार, सुदर्शन पाटील, दीपक महाजन, पंकज बारी, हर्षल पवार, मोहित पाटील यांनी गौरव व्यक्त केला आहे.