साहित्याचे वाटप पूर्ण, उद्या शहरातील लाखो मतदार ठरवणार भवितव्य
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिकेसाठी होणाऱ्या महत्त्वाच्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून शहरातील नागरिकांना लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन केले आहे. एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून आज सकाळपासूनच ईव्हीएम मशीन्स (EVM), व्हीव्हीपॅट (VVPAT) तसेच इतर आवश्यक निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्याचे वाटप पूर्ण झाल्यानंतर एकूण ३०५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना त्यांच्या नियुक्त मतदान केंद्रांकडे रवाना केले गेले.
जळगाव महानगरपालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी ही निवडणूक राबवली जात आहे. यातील १२ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, प्रत्यक्षात ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात आहेत. उद्याच्या मतदानानंतर शहरातील सत्तेची दिशा कोणाकडे जाणार, हे ठरवणारे लाखो मतदार ठरले आहेत.
मतदान केंद्रांवर सुरक्षेची उच्च पातळी ठेवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने कोणत्याही गोंधळाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. साहित्याच्या वाटपाच्या वेळी देखील वखार गोडाऊन परिसरात मोठा पोलीस ताफा उपस्थित होता. नागरिकांना सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जळगाव शहराच्या भवितव्यासाठी उद्या मतदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशासनाने नागरिकांना निर्भयपणे मतदान केंद्रांवर येऊन आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष जळगावमधील निवडणुकीच्या निकालावर लागले आहे.
