मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो,” असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले तसेच इथं सरकार चुकले हे निश्चित, असे म्हणत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला.
राज ठाकरे म्हणाले, “या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलने केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणालो तसं की, ती आंदोलने, मोर्चे याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती.”
“अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होते की प्रशासनाने असे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतेच चुकीचे पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचे चुकले हे निश्चित,” असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
