२१ जुलैला टपाल सेवा बंद राहणार, नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आगामी पिढीतील अत्याधुनिक ‘एपीटी’ अप्लिकेशन सुरु करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने आणि नागरिकाभिमुख सेवांच्या विकासाकडे वाटचाल करणारा स्वागतार्ह ठरणार आहे.
परिवर्तनाचा एक भाग म्हणून ‘एपीटी’ प्रणालीचा वापर जळगाव मुख्य डाकघर अंतर्गत सर्व टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी, २२ जुलै २०२५ पासून सुरु होईल. अशा नव्या तंत्रज्ञानामुळे टपाल व्यवहार अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने पार पडणार आहेत. दरम्यान, प्रणाली स्थलांतर, पडताळणी आणि कॉन्फिगरेशन प्रक्रियेच्या अनुषंगाने २१ जुलै रोजी जळगाव मुख्य डाकघर अंतर्गत येणाऱ्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये सेवा बंद राहणार असल्याची माहिती जळगावचे अधीक्षक डाकघर यांनी दिली. यादिवशी कोणतेही टपाल व्यवहार होणार नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या कामांचे नियोजन योग्य पद्धतीने करावे, असे आवाहन केले आहे.
सेवा वितरणात गती येणार
नवीन ‘एपीटी’ अप्लिकेशन अंतर्गत ग्राहकांचा अनुभव अधिक सुलभ करण्यावर भर दिला आहे. अशा प्रणालीमुळे सेवा वितरणात गती येणार आहे. स्मार्ट आणि भविष्यातील गरजांना पूरक अशा टपाल सेवा नागरिकांना मिळणार आहेत. डिजिटल परिवर्तनाच्या टप्प्यात नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तात्पुरत्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. असे सर्व पावले अधिक चांगल्या, वेगवान व डिजिटल सेवांच्या वितरणासाठीच उचलण्यात येत असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.