अनेकांना परतावे लागले रिकाम्या हातांनी, सक्तीच्या वसुलीमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सुरक्षा कीट तसेच संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, त्याकरीता आवश्यक स्मार्ट कार्डासाठी दलालांकडून १४०० ते १५०० रूपये सक्तीने वसूल केले जात असल्याने कामगारांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच दोन ते तीन दिवसांपासून चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरक्षा कीट तसेच संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचे काम सुरु होते. मात्र, या कामात अनियमितता असल्यामुळे अनेकांना रिकाम्या हातांनी परतावे लागले आहे. त्यामुळे कामगार लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सविस्तर असे की, बांधकाम कामगारांना जिल्हा कामगार कार्यालयाकडून काही महिन्यांपासून साहित्य वाटप सुरू आहे. हे वाटप जरी टप्प्याटप्प्याने होत असले तरी त्यामध्ये दलाल घुसले आहेत. कामगार कार्यालयाकडून कामगारांसाठी आवश्यक साहित्य पुरवण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. मात्र, हे दलाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कामगारांची लूट करत आहेत. संबंधित दलाल मजुरांकडून एक हजार ते पंधराशे रुपये केवळ कागदपत्रे नोंदणी करून घेण्यासाठी व नंतर पेटी मिळवून देण्यासाठी आणखी पैसे घेत आहेत. नोंदणी झालेल्या कामगारांना तारीखेनुसार वाटप सुरू आहे. आपल्याला साहित्य मिळावे म्हणून कामगार कोणतीही पर्वा न करता पहाटे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात धाव घेत आहेत. काही कामगार तर तेथेच मुक्काम ठोकत आहेत. मात्र काही विशिष्ट दलालामार्फत पेट्या वाटप होत असल्याने ताटकळत बसलेल्या कामगाराना रिकाम्या हातानेच परतण्याची वेळ येत आहे.
तातडीने चौकशी करून कठोर कारवाईची मागणी
स्वतःच्या घरापासून दूर ऊन, वारा व पावसात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. त्यामाध्यमातून नोंदणीकृत पुरुष व महिला कामगागारांना सुरक्षा साधनांसह संसारोपयोगी साहित्यही वाटप करण्यात येते. मात्र, त्यासाठी आवश्यक स्मार्ट कार्ड काढण्याकरीता तब्बल दीड हजार रूपयांची सक्तीने वसुली तसेच भांडी संचासाठी ८०० तर सुरक्षा पेटीसाठी ५०० रुपयांची वसुली सुरू आहे. बांधकाम कामगारांच्या ताटातील घास पळवणाऱ्या दलालांच्या आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.