दिल्लीत हालचाली वाढल्या; हवाई दल, नौदल प्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा
नवी दिल्ली (न्युज नेटवर्क) –
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे उलटले असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं जाईल’, असं विधान केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. एकीकडे सीमेवर दोन्ही बाजूंनी लष्करी सज्जता वाढवली जात असताना दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दल प्रमुख व नौदल प्रमुखांशी सज्जतेसंदर्भात चर्चा केली.
आधी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. अरबी समुद्रातील नौदलाच्या तैनातीवर त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. नौदलाच्या पश्चिमेकडच्या आघाडीवरील युद्धनौका सध्या अरबी समुद्रात उतरवण्यात आल्या आहेत. भारतीय नौदल अरबी समुद्रात सामग्रीसह सज्ज असून केंद्र सरकारचे आदेश आल्यास कारवाईसाठी तयार असल्याची माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली आहे.
नौदल प्रमुखांची भेट झाल्यानंतर काही तासांत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आणीबाणीच्या प्रसंगी कारवाईसाठी हवाई दलाची काय तयारी आहे? यासंदर्भात पंतप्रधानांशी त्यांची चर्चा झाली. या दोन उच्चस्तरीय बैठकांमुळे वातावरण बदलू लागलं आहे.
या बैठकांबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. मात्र, एकीकडे या बैठकांमध्ये लष्कराच्या तयारीची माहिती घेण्यात आलेली असताना दुसरीकडे संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.