शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उबाठातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे शिवसेना उबाठाच्यावतीने शुक्रवारी, १३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या उबाठा गटाने दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी, यासह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे, सरसकट कर्जमाफी द्यावी, शासनाने शेतकी संघांना ज्वारी खरेदीची ३ हजार क्विंटलचे उद्दिष्ट १० हजार क्विंटलपर्यंत करावे, शासनाकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना थकीत लाभ त्वरित देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा, यासह विविध मागण्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्यासोबत माजी आमदार दिलीप भोळे, जिल्हा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, तालुका प्रमुख उमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, महानगर समन्वयक संतोष पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकिर पठाण, उपमहा नगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, विभाग प्रमुख किरण भावसार, विजय बांदल, शोएब खाटीक, कलीम खान ,शरीफ रंगरेज, सचिन चौधरी, विजय राठोड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.