निकृष्ट गटारीची मला माहिती नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा

0
31

ग्रामविकास अधिकारी बाविस्कर यांनी दिले बेजबाबदारपणे उत्तर

साईमत/यावल/प्रतिनिधी :

तालुक्यातील मारूळ येथील ग्रामपंचायतमार्फत भूमिगत गटारीचे बांधकाम निकृष्ट प्रतीचे आहे. याबाबतची विचारणा यावल तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू रमजान तडवी यांनी ग्रामविकास अधिकारी आर.टी.बाविस्कर यांना केल्यावर त्यांनी बेजबाबदारपणे उत्तर दिले की, मला याबाबत काही माहिती नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा. अशा उद्धटपणाच्या वागणुकीमुळे आणि चौकशी न झाल्यामुळे आरपीआयतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मारूळ येथे ६ महिन्यापूर्वी पंचायत समिती आणि मारूळ ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात आलेल्या भूमिगत गटारीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि निकृष्ट बांधकाम साहित्यात झाले असून याची चौकशी खात्री न करता तसेच लेखी तक्रार केलेली असताना ठेकेदारांचे बिल अदा केले कसे ? या भूमिगत गटारींचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे या निकृष्ट दर्जाचे बांधकामाचे वृत्त प्रसिद्धी माध्यमातून झळकले आहे.तरीही संबंधितांमार्फत शासनाला जाग आली नाही. हे मारूळ ग्रामस्थांचे दुर्भाग्य असून ठेकेदारांला कामाचे बिल देऊन टाकले.

गटारींचे सहा महिन्यात १२ बारा वाजले

गटारींचे सहा महिन्यात १२ बारा वाजले आहेत. त्याठिकाणी घाण पाणी साचून दुर्गंधी येत आहे तसेच गटारी बांधकाम बाबत मारूळ ग्रा.पं.चे ग्रामविकास अधिकारी बाविस्कर यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की मला काहीच माहित नाही तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा, असे बेजबाबदारपणे उडवाउडवीचे उत्तर ग्रामविकास अधिकारी आर.टी.बाविस्कर यांनी तक्रारदारांना दिले. ज्या उद्देशाने शासनाच्या लाखो रुपये खर्चाच्या निधीतून मारूळ बस स्थानक परिसरातील मुख्य मार्गावर भूमिगत गटारीचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही तरी या सर्व निकृष्ट व बोगस गटारींच्या कामाची, गुणवत्तेची तात्काळ चौकशी यावल पंचायत समिती वरिष्ठाकडून चौकशी आणि कार्यवाही न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या माध्यमातून यावल पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात येईल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्यापही चौकशी नाही

गटविकास अधिकारी यांनी मला आंदोलन स्थगित करावे, असे लेखी पत्र दिले होते. पण आजपर्यंत कोणतीही चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झालेली नाही. सोबत अर्जाची प्रत जाेडलेली आहे. जर आता कामाची सखोल चौकशी आणि कार्यवाही न झाल्यास रिपाई आठवले गटामार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here