बैलगाडी चक्काचूर; वाकोद शेतकऱ्याचा पुनर्जन्म
साईमत /जामनेर/ प्रतिनिधी
जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद येथे बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. पुण्याकडे जात असलेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाडी चक्काचूर झाली, मात्र बैलगाडीवरील शेतकरी आश्चर्यकारकरीत्या बचावला. घटनेचे थरारक व्हिडीओ जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, जे पाहून अंगावर काटा येतो.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजता जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी बस अतिवेगाने जात होती. वाकोद गावाजवळ, रस्त्याच्या कडेला एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन उभा होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने थेट बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की बैलगाडीचे लाकडी भाग हवेत उडाले आणि गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दृश्ये पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. मात्र, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे, बैलगाडीवरील शेतकरी या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर पडला.
अपघातानंतर वाकोदच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. महामार्गावरील वाहनांच्या वेगामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे सांगत त्यांनी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण केला.
सदर घटना आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ग्रामस्थ आणि नागरिक महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
या घटनेने महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला पुन्हा एकदा सतर्क केले आहे, आणि येत्या काळात मार्गावर नियंत्रण व सुरक्षिततेसाठी विशेष पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
