साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात ६ मार्च रोजी घडलेल्या एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या रागिणी चंपालाल पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना त्यांच्या पती चंपालाल पाटील यांच्या दुचाकीला ट्रकने कट लागल्यानंतर घडली. या अपघातात रागिणी पाटील यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली होती. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि नंतर पुणे येथील सैनिकांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ११ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला.
रागिणी पाटील या भुसावळ येथील साई शंकर नगरात राहत होत्या. त्या आणि त्यांचे पती जळगाव शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी जात असताना हा अपघात झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.