महापौर दीपमाला काळे आदेशाने सुरू शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि महामार्गावरील अपघातांचा धोका लक्षात घेता महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील मुख्य महामार्ग तसेच त्यावरील समांतर रस्ते तात्काळ अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला पुढील दोन ते तीन दिवसांत ही कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यावर भर दिला जात आहे.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. परंतु महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांवर अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहे. यामुळे वाहतूक कोंडी अधिक गंभीर बनली असून अपघातांचा धोकाही वाढत आहे.
महापौर काळे यांनी तातडीने बैठक घेतली आणि अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला गती देण्याचे आदेश दिले. महापालिकेतर्फे महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांवर टाकण्यात आलेले बांधकामाचे वेस्ट मटेरियल उचलण्याचे कामही हाती घेतले आहे. या कामासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अतिक्रमण हटवल्यानंतर वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्यावर विशेष भर दिला जाणार असून, नागरिकांना सुरक्षित व वेगाने प्रवास करण्याची सुविधा मिळेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यासोबतच महापौरांनी शहरातील प्रमुख व्यापारी संकुलांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेशही दिले आहेत. व्यापारी भागात स्वच्छता राखणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण प्रदान करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापारी संकुल परिसरात कचरा किंवा इतर अडथळे निर्माण झाल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याचे संकेतही महापौरांनी दिले.
लाईव्ह ट्रेंड्सशी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “शहरातील रस्ते मोकळे ठेवणे, वाहतूक सुरळीत करणे आणि परिसरातील स्वच्छता राखणे ही महापालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. यासाठी अतिक्रमण हटवण्याबरोबरच स्वच्छता मोहीम देखील राबवली जात आहे.”
