हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
जिल्ह्यात रविवारपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. दरम्यान, गिरणा धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. ९६.८ टक्के धरण पाण्याने भरले आहे. त्यामुळे गिरणाचे दोन दरवाजे ३० से.मी.ने उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. वाघूर धरणही ९१.६१ टक्के भरले आहे. वाघूर नदीला मोठा पूर आल्याने धरणातील पाणीसाठी वाढत आहे.
गिरणा धरणाची आजची पाणी पातळी (वॉटर लेव्हल) ३९७.९३२ मी.पर्यंत आली आहे. त्यामुळे दोन हजार ४४२ क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने धरणाचे १८ दरवाजे उघडून त्यातून ९९ हजार ९४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धरणातील पाणी पातळी वाढली
सर्वच मोठ्या धरणातील पाणी पातळी वाढत असल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.