साईमत, जळगाव ः प्रतिनिधी
गेल्या सात दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशात पुढील सहा दिवस तरी राज्यात पावसाची शक्यता नाही. त्यानंतर मात्र, राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यात १६ ते ३० ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही जोरदार पाऊस पडेल. राव्ोर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याव्ोळी जळगाव जिल्ह्यात ११ व १२ ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तवला.
अडीच महिने पावसाचे
पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना यावेळी हवामाना संदर्भात मार्गदर्शन केले. पुढील अडीच महिने पावसाचे आहेत. राज्यात या काळात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर,ऑक्टोबरमध्येही यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. ९) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने सांगितल्यानुसार, मान्सून कमजोर झाल्याने राज्याच्या अनेक भागात मुख्यतः पावसाची उघडीप आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.
राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष
राज्यात दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, याबद्दल सरकार विचार करत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. विखे पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु अजूनही सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, याबाबत सरकार विचार करत आहे.