दुपारच्या वेळेत रस्ते ओस; उकाड्यात वाढ, हवामान खात्याने आणखी तापमान वाढीचा इशारा
साईमत / जळगाव
एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच जळगाव जिल्ह्यात उष्णतेने आपला कडाका वाढवला असून शहराने पुन्हा एकदा ‘हॉट शहर’ अशी ओळख ठळक केली आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात तब्बल ५ अंशांहून अधिक वाढ होऊन पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला तुलनेने सौम्य असलेली उष्णता आता प्रचंड तीव्र झाली आहे. गुरुवारी जळगावचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र अवघ्या ४८ तासांतच तापमानात मोठी वाढ होऊन शनिवारी ते ४१ अंशांवर पोहोचले. कोरड्या हवेमुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहेत.
सकाळी १० वाजल्यानंतरच उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत मुख्य बाजारपेठा आणि रस्ते पूर्णतः ओस पडत असून सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक लिंबू सरबत, उसाचा रस आणि विविध शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत.
दरम्यान, रात्रीच्या तापमानातही वाढ नोंदवली जात आहे. ९ व १० एप्रिल रोजी किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअस होते, तर ते ११ एप्रिल रोजी वाढून २१.५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळीही उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून जळगावकरांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
