पक्षाकडून ३८ वर्षाच्या खडतर प्रवासाची मिळाली पावती
साईमत/जळगाव/धरणगाव/प्रतिनिधी :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसंदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्यांची नुकतीच घोषणा केली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात चौघांच्या नियुक्त्यांबाबत माहिती दिली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातून धरणगावचे रहिवासी तथा विद्यमान जळगाव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांचाही समावेश आहे. तसेच त्यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. १९८४ मध्ये दहावी पास झाल्यावर त्यांनी धरणगाव येथे कला आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी सेनेची शाखा काढली. त्यांनी विद्यार्थी दशेत असतानाच शिवसेनेत उडी घेतली होती. शिवसैनिक ते शिवसेनेचा उपनेता असा त्यांनी ३८ वर्षे निष्ठेने पक्षाचा खडतर प्रवास केल्याचे फळ अखेर त्यांना मिळाले आहे.
शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाला अनुसरून त्यांची निस्वार्थ सेवा सुरू आहे. पक्षाने व संघटनेने त्यांना योग्य ती मानाची पदे दिली असली तरी त्यांच्या कामाची धडाडी, नेतृत्वाचा भर आणि शिवसैनिकांचे पाठबळ अशी त्यांना पावती मिळाल्याने त्यांची उपनेतेपदी पक्षाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना निवड मंडळ, जिल्हा नियोजन मंडळ, संजय निराधार समिती, समन्वय समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
रावेरसह नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख पदाचीही राहणार जबाबदारी
धरणगाव शहराचे आराध्य दैवत श्री बालाजी मंदिर देवस्थानचे श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. व्यायाम प्रसाद मंडळावर संचालक म्हणून ते काम करत आहेत. तसेच गुरुवारी, ५ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खा.संजय राऊत, संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी संघटनेच्या कठीण काळात शिवसेना उपनेता आणि नंदुरबार जिल्हा व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.