वाचनासाठी ३०० विद्यार्थी तर चर्चेत ३५ विद्यार्थ्यांचा सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय विभागात वीर बाल दिवस, ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन व गट चर्चा असे दोन उपक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमात सुमारे ३०० विद्यार्थी वाचनासाठी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी ज्ञानस्रोत केंद्राच्यावतीने अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. सोपान इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जयदीप साळी, प्रा. पवित्रा पाटील, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. चंद्रशेखर वाणी, विजय आहेर, प्रवीण चंदनकर आदी उपस्थित होते.
वीर बाल दिवस दरवर्षी २६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस दहावे शीख गुरु श्री गुरु गोबिंद सिंह महाराज यांच्या सुपुत्र साहिबजादे जोरावर सिंह व फतेह सिंह यांच्या अद्वितीय शौर्य, बलिदान व धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ पाळला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, नैतिक मूल्ये, देशभक्ती व श्रद्धा निर्माण व्हावी, असे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी मार्गदर्शन करताना म्हणाले. त्यानंतर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी यांनी विद्यार्थ्यांना गटचर्चेचे नियम समजावून सांगितले. ग्रंथवाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. अधिसभा सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम यांनी विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व समजावून मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमध्ये “भारतीय ज्ञान प्रणाली सक्षम युवक घडविण्यात समर्थ आहे का…?”, “ती जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे का…?”, आणि “भारत खरंच विकसित होत आहे का…?” अशा विषयांवर गटचर्चा आयोजित केली होती. चर्चेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, तर विजयी विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. कविता पाटील, प्रा. योगेश माळी कार्यरत होते.
