जिल्ह्यातील ६ तालुक्यांत भूजल पातळी खालावली
जळगाव (प्रतिनिधी)-
जळगावसह राज्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये भूजल पाणी पातळीत घट झालीय. पाऊण ते सव्वा मीटरपर्यंत घट झाली असून या सहा तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढली होती. गेल्या वर्षापेक्षा यंदा भूजल पाणी पातळीतील घट कमी असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. तरीदेखील जिल्ह्यातील तापमान ४२ अंशाच्यावर गेल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. याचा परिणाम म्हणून पाणी पातळी घटत आहे.
वरीष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे पाच वर्षाची पाणी पातळीची सरासरी लक्षात घेऊन १५ तालुक्याची पाणी पातळी मोजली जाते. विहीरींचेही निरीक्षण केले जाते. गेल्यावर्षी १३० टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असले तरी यंदा एप्रिल महिन्यातच सहा तालुक्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे.
अमळनेर तालुक्यात अधिक पाण्याची समस्या पाहण्यास मिळते. यंदा मात्र चाळीसगाव, पारोळा, जामनेर, धरणगाव, एरंडोल, अमळनेर या सहा तालुक्यात ०.७७ ते १.११ मीटर मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाली आहे. आगामी काळात पाण्याचे स्रोत आटून पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र पाणी पातळीत अल्प स्वरूपात घट झाली आहे.