निरंकारी संत समागमाच्या पार्श्वभूमीवर भुसावळहून सांगलीकडे विशेष रेल्वेगाडी रवाना करण्यात आली.
साईमत/ भुसावळ/प्रतिनिधी –
संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरंकारी संत समागमाच्या पार्श्वभूमीवर भुसावळहून सांगलीकडे विशेष रेल्वेगाडी रवाना करण्यात आली. शुक्रवार, २३ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता विशेष रेल्वेगाडी क्रमांक 01209 भुसावळ रेल्वे स्थानकावरून भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात मार्गस्थ झाली.
या रेल्वेच्या माध्यमातून भुसावळसह जळगाव, पाचोरा व चाळीसगाव परिसरातील भाविकांना समागमासाठी प्रवासाची सोय करण्यात आली होती.सतगुरु माताजी यांच्या असीम कृपेने तसेच झोनल इंचार्ज महात्मा हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष रेल्वे सेवा आयोजित करण्यात आली होती. संत निरंकारी मंडळाच्या विविध शाखांच्या सहकार्याने रेल्वेचे यशस्वी आयोजन पार पडले.
रेल्वे रवाना होत असताना भजन, सत्संग आणि जयघोषांनी परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला. यावेळी भुसावळचे आमदार व कॅबिनेट मंत्री संजय सावकारे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. रजनी सावकारे यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास भुसावळ रेल्वे विभागातील अधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, समाजसेवक, तसेच अजय नागराणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या विशेष रेल्वेमधून भुसावळ तालुका व संपूर्ण जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. भजन मंडळी, सत्संग मंडळी आणि सेवादल सदस्यांची उपस्थिती प्रवास मंगलमय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असल्याचे पाहायला मिळाले. भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह, श्रद्धा आणि सेवाभाव यांचे दर्शन झाले.
यावेळी उपस्थित भाविकांनी संत निरंकारी मंडळाच्या कार्याची स्तुती करत धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव घेतला, तसेच आगामी समागमासाठी आपली भक्ती प्रकट केली.
