डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात अमृत महोत्सवानिमित्त मान्यवरांकडून गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणून गोविंद देवरे यांनी जीवनपणाला लावले. कवितेचे वेड लावणारा माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाईल. आता त्यांनी उर्वरित आयुष्य जगताना कवितेसाठी जगावे, असे प्रभावी प्रतिपादन साहित्यिक तथा कवी डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. जळगाव शहरातील जि.प.जवळील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात साहित्य विकास मंडळाच्यावतीने रविवारी, १ जून रोजी साहित्यिक, कवी गोविंद देवरे यांच्या आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षीयस्थानावरून बोलत होते. सुरुवातीला दै.‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव, ज्येष्ठ कवी डी.बी. महाजन, पितांबर भारुडे, भास्करराव चव्हाण, कवयित्री शितल पाटील, पुष्पा साळवे, मंदा मोरे तसेच आदींच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या नेतृत्वाचा उपस्थित मान्यवरांनी गोविंद देवरे यांचा यथोचित गौरव केला. यावेळी कवी निंबा बडगुजर यांनी आपला ‘पोवाडा’ संग्रह भेट दिला. कार्यक्रमाला कवी जयसिंग वाघ, आर.डी. कोळी, कलावंत विनोद ढगे, विलास सोनवणे, रमेश बनकर, गोविंदराव पाटील, माधव खरात, किशोर गायकवाड यांच्यासह साहित्य विकास मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोविंदरावांनी चळवळीतून चालविला संसाराचा गाडा
याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील, वाणी, यांच्यासह इतर साहित्यिकांनी देवरे यांना पुस्तक भेट दिले. गोविंद देवरे आदर्श जीवन जगले, चळवळीतून त्यांनी संसाराचा गाडा चालवला. त्यांच्या परिवाराने त्यांना आता पुढील वाटचालीसाठी चांगल्या प्रकारे वागून घ्यावे, अशा भावनाही उपस्थितांनी व्यक्त केल्या. यशस्वीतेसाठी चेतन देवरे, विलास सोनवणे, रमेश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक, सुत्रसंचलन तर आभार पत्रकार रमेश जे. पाटील यांनी मानले.