जामनेरातील चैतन्य धामात कन्या पूजनात ३५० कन्यांचा सन्मान
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
मुलींनी दुर्बल न राहता सबल बनावे. स्वतःचे रक्षण स्वतः करावे. आजच्या काळात मुलींनी ‘पराटे’ सोबत ‘कराटे’ आणि ‘बाटी’ सोबत ‘लाठी’ शिकणे आवश्यक असल्याचे प्रभावी मार्गदर्शन प.पू.श्याम चैतन्य महाराज यांनी केले. हिंदू संस्कृतीत नारी पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत अष्टमीला कन्या पूजन कार्यक्रम पारंपरिक स्वरूपात आयोजित केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर, रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी गुरुदेव सेवाश्रम येथील चैतन्य धाम येथे परिसरातील ३५० कन्यांचा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात कन्यांचे पाय स्वच्छ करून पुसून, पूजन केले गेले. त्यानंतर भोजन व दक्षिणा देण्यात आली. यावेळी अनेक कन्या आणि महिलांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, कमल महाजन, उत्तम राठोड, विजय पाटील, किशोर नाईक, प्रा. उमाकांत पाटील, गोकुळ चव्हाण, नटवर चव्हाण, विठ्ठल जाधव, नीलेश चव्हाण, बन्सीलाल चव्हाण, हरी महाजन, विकास पवार, सुनील पवार, बद्री राठोड, अविनास पवार, गणेश राठोड, विश्वनाथ चव्हाण, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशाबद्दल चैतन्य धामचे सचिव रवींद्र महाजन यांनी आभार मानले.