कामायनी एक्सप्रेस प्रकरण : चार आरोपींसह साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर हल्ला करून पैशांची बॅग हिसकावणाऱ्या चार आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पकडले आहे. कारवाईत तब्बल साडेचार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बऱ्हाणपूर–जळगाव मार्गावरील कामायनी एक्सप्रेसमध्ये गेल्या ९ सप्टेंबर रोजी प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (वय ६०, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) यांच्यावर चार संशयितांनी हल्ला करून त्यांच्याकडील बॅग हिसकावली होती. घटनेनंतर आरोपी रावेर स्टेशनवर उतरून फरार झाले होते. तपासाअंती १८ सप्टेंबर रोजी जी.एस. ग्राऊंड परिसरात संशयित आरोपींच्या हालचाली दिसत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयितांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल साडे चार लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. चौकशीत आरोपींनी रेल्वेत दरोडा टाकल्याची कबुली दिली. अटक केलेल्यांमध्ये किरण पंडीत हिवरे (वय ३२, रा. भात्तखेडा, ता. रावेर), अजय सुपडू कोचुरे (२५, रा. खिर्डी, ता. रावेर), हरिष अनिल रायपुरे (२५, रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपूर, म.प्र.), गोकुळ श्रावण भालेराव (२७, रा. डांभुर्णी, ता. यावल) यांचा समावेश आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी सोपान गोरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयूर निकम यांनी केली. तसेच तांत्रिक मदत गौरव पाटील, मिलींद जाधव यांनी केली.