उन्मेष पाटीलच्या प्रवेशामुळे चाळीसगावात शिवसेनेला नव्या शक्तीची भर
साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी
जिल्ह्यातील राजकीय वारे आता पूर्णपणे उलटे वळले आहेत. माजी खासदार उन्मेष पाटील यांनी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे आधीच कमकुवत स्थितीत असलेल्या शिवसेना-उबाठा पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.
गत लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील देखील होते. तथापि, विधानसभेत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मंगेश चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांचा पराभव केला, तर चाळीसगाव आणि जळगाव महापालिका निवडणुकीतही पक्षाला धक्कादायक निकाल भोगावा लागला.
या पार्श्वभूमीवर, उन्मेष पाटील यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला चाळीसगावमध्ये ताकद वाढवण्याची संधी मिळणार आहे. पाचोरा आणि पारोळा मतदारसंघात पक्षाचे विद्यमान सामर्थ्य लक्षात घेतले तर चाळीसगावातील भाजपचे वर्चस्व कमी करण्यासाठी ही एंट्री महत्त्वाची ठरू शकते. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उन्मेष पाटील यांच्या आगमनाचा पक्षाला नक्कीच लाभ होण्याची शक्यता आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भाजप आणि शिवसेना दोन्ही महायुतीचे घटक असले तरी अनेक मतदारसंघांमध्ये त्यांच्यात वर्चस्वाची तीव्र लढाई सुरू आहे. पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा या भागांमध्ये ही लढाई विशेष ठळक आहे. यापूर्वी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करत नगरपालिकेत विजय मिळवला होता, ज्यामुळे शिवसेनेची स्थानिक स्थिती मजबूत झाली आहे.
पक्षाच्या या रणनीतीमुळे चाळीसगावमध्येही शिवसेनेच्या राजकीय बळात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, पारोळ्यातील करण पवार यांचा प्रवेश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींचा थेट परिणाम शिवसेना-उबाठा पक्षाच्या भविष्यावर होणार हे नाकारता येणार नाही.
