दोन नंबर प्लेटची कार ठरली जीवघेणी पाच जण जखमी
साईमत/मुक्ताईनगर / प्रतिनिधी
नागपूर–मुंबई महामार्गावर मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरात बुधवारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने राँग साइडने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच मजुरांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, जळगावकडून मुक्ताईनगरच्या दिशेने येणारी कार अचानक राँग साइडने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांवर धडकली. या भीषण अपघातात प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी हे पाच जण जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार दोन जणांची प्रकृती गंभीर असून उर्वरित तिघांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अपघात घडल्यानंतर कारमधील चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कारचा वेग अत्यंत जास्त होता आणि धडक इतकी जोरदार होती की वाहनाचा पुढील भाग चुराडा झाला.
अपघातानंतर कारची तपासणी करताना वाहनावर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट लावण्यात आल्याचे आढळून आले. याशिवाय कारमध्ये पोलिसांच्या काठ्या तसेच पोलीस वर्दीही सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे अपघातामागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची नोंद केली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच कारवरील नंबर प्लेट व वाहनातील साहित्याच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
