प्रतापराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे केले आवाहन
साईमत/भडगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील कोळगाव येथील राज मंगल कार्यालयात शेतकरी, कार्यकर्ता मेळावा उत्साहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी डी. आर. पाटील होते. सुरुवातीला पिचर्डे येथील राजू पाटील टेलर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तात्यासाहेबांचे तालुक्यावर खूप उपकार आहेत. त्यासाठी सर्वांनी एक व्हा, आपली ताकद दाखवून द्या आणि नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन केले.
माजी सरपंच शिवाजी पाटील यांनी स्वाभिमान गहाण ठेवू नका आणि निष्ठा काय असते, असे आवाहन केले. कोळगावचे सुरेश बोरसे म्हणाले की, लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि त्यांना निवडून आणा. पेंडगावचे भास्कर पाटील यांनी भडगाव तालुका ५२ वर्षापासून वंचित आहे. आपल्या तालुक्याची अस्मिता जागृत ठेवून नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन केले.पांढरदचे रघुनाथ पाटील म्हणाले की, तात्याबाबांनी पहिली शाळा कोळगाव याठिकाणी सुरू केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नानासाहेबांनी कोळगाव येथे शेतकरी मेळावा ठेवला. शिंदी येथील भालचंद्र पाटील यांनी भडगाव तालुक्यातील सगळ्यांनी एकसंघ व्हावे आणि नानासाहेबांना विजयी करावे. कारण भडगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे योगदान आहे, असे सांगितले. खेडगावचे विश्वास पाटील म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात एक नंबर विकास तात्याबाबांनी केला. नानासाहेबांनी केला. प्रा. उत्तम पाटील म्हणाले की, ही परिवर्तनाची लाट आहे. यासाठी सर्वांनी नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. अंजनविहिरेचे देविदास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. वडजीचे माजी सरपंच बी.वाय.पाटील म्हणाले की, ही आरपारची लढाई आहे. डॉ.पूनमताई पाटील म्हणाल्या की, सामान्य जनतेचे प्रश्न नानासाहेबांच्या माध्यमातून सोडवू. तसेच तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ.महिला सक्षमीकरणावर भर देऊ. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी विधानसभेचे इच्छुक उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनीही उपस्थितांना मतांचे दान पदरात टाकण्याचे आवाहन केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतात डी.आर.पाटील यांनी नानासाहेबांच्या उमेदवारीला साथ द्या, असे आवाहन केले.
यांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अन्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी केले.