जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून ४१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
तालुक्यातील रुईखेडा येथे शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून ४१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकनाथ जगन्नाथ कांदले (वय ४१) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते रुईखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मयत एकनाथ कांदले यांच्या भावाने पोलिसांना दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ कांदले हे बटाईने केलेल्या शेतात काम करत होते. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कांदले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय पवार हे पुढील तपास करत आहेत.



