कीटकनाशके फवारणी करतांना जरंडीत घडली घटना
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
कपाशी पिकांवर फवारणी करतांना विषबाधा होऊन सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शेतमजुराचा जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सात वाजता घडली. दरम्यान, याप्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. युवराज दलपत पवार (वय ३५, रा.जरंडी, ता.सोयगाव) असे कीटकनाशके फवारणी करतांना विषबाधा होऊन मृत झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील कर्त्या तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात बुधवारी (दि.१४) शेतात कीटकनाशके फवारणी करतांना विषबाधा झाली होती. त्यानंतर त्यास तातडीने बुधवारी रात्री उपचारासाठी तातडीने जळगाव येथे दाखल केले होते. परंतु विषबाधा अती गंभीर झाल्यामुळे त्याची प्रकृती नियंत्रणात आली नव्हती. जळगावच्या सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी (दि.१९) मृत्यू झाला. पाच दिवस युवराजने मृत्युशी झुंज दिली होती.
जळगावला त्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.