पुढचे १५ दिवस भयंकर उष्णतेचे, काळजी घ्या !
जळगाव (प्रतिनिधी )-
सध्या कडक उन पडत असून येत्या पंधरा दिवसात तापमानाचा पारा चढतच जाणार असल्याचा अंदाज असून यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमान सातत्याने वाढत असून आता शेवटचा आठवडा येत असतांना भर पडली आहे. काल जळगाव शहरासह बहुतांश तालुक्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सीयसपेक्षा जास्त होते. आज आणि पुढील दोन आठवड्यांमध्ये पारा मोठ्या प्रमाणात चढणार असल्याचे भाकित हवामानविषयक संकेतस्थळांनी वर्तविले आहे.
23 एप्रिल रोजी तापमान 42 ते 43 अंश सेल्सीयसदरम्यान राहणार आहे. आगामी पाच दिवसांमध्ये पारा 42 अंशाच्या आसपास राहणार आहे. 29 एप्रिलनंतर मात्र तापमान प्रचंड वाढणार असून दररोज तापमान 44 अंशांपेक्षा जास्त जाऊ शकते असा इशारा या संकेतस्थळांनी दिला आहे.
29 एप्रिल ते 10 मे या कालखंडात प्रचंड उष्मा असल्याने नागरिकांनी या कालावधीत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने शरिरातील पाण्याची पातळी कायम राखण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असेदेखील सुचविण्यात आले आहे.