पद्मालय विश्रामगृहात आयोजित बैठकीत कास्ट्राईब संघटनेच्या कार्याध्यक्षांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शासकीय, निमशासकीय क्षेत्रात काम करणारा कर्मचारी हा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतो. अशावेळी अनेक विविध समस्या, लोकसंपर्काच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींचा असणारा कामासाठीचा दबाव, दडपण याचा विचार करता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘कर्मचारी संघटना’ ही साधन आहे. संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांनी केले. शहरातील पद्मालय विश्रामगृहात आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष सुनील सोनवणे होते.
शासकीय, निमशासकीय तसेच प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कायद्याच्या चौकटीत रहावे. नियम, नियमावलीला अवगत करावे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान होईल, अशा दृष्टीने कर्तव्य परिपूर्ती करावी. त्यामुळे कार्यालयाचा चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण होते. तसेच येणाऱ्या अडचणी आपल्याला सोडविता येतात.आपल्या सेवेत निश्चितपणे संघटनेचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा असतो.ते संघटन मजबूत करण्यासाठी आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे मत कास्ट्राईब शासकीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी व्यक्त केले.
संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून नाशिक विभागातील जिल्ह्यात मेळाव्यांचे आयोजन करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून संघटन मजबूत करण्याचे आवाहन प्रमुख पाहुणे रावसाहेब जगताप यांनी केले. बैठकीत मोहन पालवे, डॉ. प्रदीप सुरवाडकर, सुनील जाधव, गौतम वाडे, दिलीप शिरतुरे, सलीम तडवी यांनीही संघटन करण्याच्या दृष्टीने मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नाशिक विभागीय अध्यक्षपदी रावसाहेब जगताप यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
बैठकीला रवींद्र पालवे, अनिल पगारे, बैसाणे आप्पा, सलिम तडवी, नारायण तुपकर, डी. ओ. सोनवणे, प्रदीप इंगळे, नरेंद्र निकुंभ, प्रशांत सोनवणे, गोपाल सोनवणे, नाना पाटील, मुकुंद इंगळे, बुद्धभूषण सपकाळे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. टी. सोनवणे, सूत्रसंचालन बापूराव पानपाटील तर आभार जितेंद्र जावळे यांनी मानले.