जामनेरातील पत्रकार परिषदेत दिलीप खोडपे सर यांनी उपस्थित केला प्रश्न
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात ना. गिरीष महाजन यांच्या प्रयत्नामुळे महापुरुषांचे पुतळे उभारले जात आहेत. पुतळे उभारणे ही चांगली गोष्ट असली तरी स्व स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निवडणुका जाहीर होण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी घाईगडबडीत महापुरुषांचे पुतळे उभारले जात असल्याने कामाचा दर्जा चांगला कसा असू शकतो. त्याचा विसर मंत्री ना. महाजन यांना पडला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर विधानसभेचे संभाव्य उमेदवार दिलीप खोडपे सर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. महापुरुषांचे पुतळे उभारणे चांगली गोष्ट, पण घाई का…? असाही प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा रस्त्यालगतच्या बोहरा मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, दत्तात्रय साबळे, प्रदीप गायके, मनोज महाले, मनोहर चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, मतदार संघात घाईघाईत फक्त महापुरुषांचे पुतळे उभारून चालत नाही. त्यासाठी ३० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे आवश्यक होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत इंचन इंच जमीन ओलिताखाली आणण्याचे आश्वासन तालुक्यातील शेतकरी व मतदारांना देण्यात आले होते. त्याचे काय झाले. एमआयडीसीच्या माध्यमातून लाखो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार होते. ते प्रकल्पच (टेक्सटाइल पार्क) अमरावतीला गेले. शिवसृष्टी आणि भीमसृष्टी येथे उभारण्यात आली. या गोष्टीचा आम्हाला आनंदच आहे. पण ज्या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात आली त्या जागेवरील असलेल्या दुकानदारांसह शहरातील अतिक्रमण धारकांना बेरोजगार करण्यात आले त्याचे काय? असाही प्रश्न त्यांनी दिलीप खोडपे सर यांनी उपस्थित केला आहे.
जलजीवन मिशनच्या योजना अपूर्णावस्थेतच
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. अशा गावांच्या जलजीवन मिशनच्या योजना अपूर्णावस्थेतच आहेत. त्यांना कधी पाणी मिळेल, असे अनेक प्रश्न पत्रकार परिषदेत खोडपे सर, किशोर पाटील, डॉ.प्रशांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.