महावितरणच्या कारवाईत तलाठी कार्यालयातील कामकाज ठप्प
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी
भुसावळ शहरातील प्रशासनाचा पुन्हा एकदा हलगर्जीपणा समोर आला आहे. तलाठी कार्यालयाचे तब्बल ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत राहिल्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)ने १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला.
माहितीनुसार, एप्रिल २०२४ पासून तलाठी कार्यालयाचे वीज बिल थकीत होते. महावितरणने वारंवार सूचना दिल्या, परंतु थकीत रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही. अखेर वीजपुरवठा खंडित करणे हा एक अत्यंत आवश्यक निर्णय झाला.
वीजपुरवठा बंद झाल्यामुळे कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. विविध दाखले, नोंदी आणि इतर प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, कार्यालयात वीज नसल्यामुळे संगणकीय कामकाजही ठप्प झाले असून नागरिकांची पायपीट वाढली आहे.
सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करत तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून लवकरच ही समस्या दूर करावी, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.ही घटना प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी आणि नागरिकांना होणाऱ्या असुविधेची ज्वलंत उदाहरण ठरली आहे.
