जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आयुक्तांना निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत मनपा प्रशासन अनेक त्रुटींनी भरलेले काम करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण सोडत तसेच नुकत्याच प्रकाशित केलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने निवडणुका तत्काळ घेऊ नयेत, अशी मागणी पक्षाने केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी प्रभाग रचना जाहीर केल्या. त्या प्रभाग रचनेवर अनेक नागरिकांनी व निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या आहेत. परंतु मनपा प्रशासनाने हरकतीबाबत काहीही कारवाई केली नाही. इतर मागासवर्ग आरक्षण काढण्याबाबत ही मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने राज्य निवडणूक आयोगाने फटकारल्याने परत काही ठिकाणचे आरक्षण काढावे लागले. २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या. त्यातही मोठ्या प्रमाणात घोळ केला आहे. पाच ते सहा हजार तक्रारी मनपाकडे नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात प्रारुप यादीत प्रत्येक प्रभागात दोन ते तीन हजार नावे दोन्ही प्रभागात दुबार आली आहे. याद्या प्रभाग वाईज विभाजित करीत असताना गोंधळ करून ठेवला आहे. १५ ते २० वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेले नावे व मृत्यू पावलेले मतदारांचे नावे अजूनही सर्व प्रभागातील याद्यामध्ये दिसून येत आहे. सत्ताधारी पार्टीतील इच्छुक उमेदवारांना निवडणूक सोपी जावी. त्यांना निवडणूक लढण्याकामी सोपे जावे याकरिताच मनपा प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून प्रभाग रचना असो की, आरक्षण सोडत असो व आता मतदार याद्यामध्ये करण्यात आलेला गोंधळ असो हा सोयीस्करपणे केला आहे, असे आमचे ठाम मत आहे.
मतदार यादीतील दुबार नावे मृतांची नावे दुसऱ्या विधानसभा मतदार संघातील नावे व मतदार याद्या विभाजित केल्यानंतरही दोन-दोन, तीन- तीन प्रभागातील आलेले नावे कमी करण्याचा अधिकार मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहे. प्रभाग मतदार यादीतील दुबार नावे मृत्यूंची नावे व इतर मतदारसंघात व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील नावे कमी केल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये. तसेच मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी अजून आठ दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महानगर अध्यक्ष एजाज मलिक, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक अध्यक्ष रिंकु चौधरी, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे, मजहर पठाण, डॉ. रिजवान खाटीक, गौरव वाणी, कलाबाई शिरसाट, रहीम तडवी, आकाश हिवाळे, गणेश पाटील, गौरव डांगे, कैलास पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
