शिक्षण क्षेत्रातील संघटनांसह शिक्षकांनी बदल्यांबद्दल व्यक्त केला आनंद
साईमत/नाशिक/प्रतिनिधी :
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात सदैव चर्चेत राहिलेला व वादग्रस्त निर्णयाने गाजलेल्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व उपसंचालकांच्या बदल्यांचे आदेश काढून शिक्षणमंत्र्यांनी वादग्रस्त अधिकाऱ्यांना अखेर चंद्रपूर, गडचिरोलीत पाठवून भाकरी फिरवली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन आदेशानुसार गट ‘ब’ मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. बदल्यांचे आदेश काढून शिक्षण विभागाने अर्थात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी वादग्रस्त अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवली आहे. झालेल्या बदल्यांबद्दल शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी, शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
नाशिक शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांची विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ अमरावती येथे तर माध्यमिक शिक्षणाधिकारी जि. प. नाशिकचे प्रवीण पाटील यांची शिक्षणाधिकारी (योजना) जि. चंद्रपूर येथे तर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची शिक्षणाधिकारी (योजना) जि. प. गडचिरोली येथे बदली केली आहे. त्याच्या आदल्या दिवशीच उपशिक्षणाधिकारी गट ‘ब’ मधील नाशिकचे उदय देवरे, गणेश फुलसुंदर यांच्यासह वेतन पथक अधीक्षक शरदचंद्र चव्हाण, नितीन पाटील यांच्याही बदल्या करून नाशिकच्या शिक्षण विभागात चांगलाच खांदेपालट केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी नेहमीच वादग्रस्त कारभाराने, अरेरावी, शिक्षकांबद्दल चुकीचे आदेश, शालार्थ आयडी, वेतन पथकातही शिक्षकांच्या वर्ष-दोन वर्षे प्रलंबित बिले थकवणे, पैशाशिवाय काम न करणे, बाहेर बसून काम करणे, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी, मारहाण करणे अशा विविध कारणांनी गाजलेले होते. त्यात तर काही अधिकाऱ्यांचे विधानसभेत व विधान परिषदेतही पडसाद उमटले होते. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहत आले होते. अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत मागील काळात संघटनांनी आवाज उठवूनही कुठलाही उपयोग झाला नव्हता. मात्र, मूळचे नाशिक जिल्ह्याचे व राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्याकडे संघटनांनी, शिक्षकांनी आपली गाऱ्हाणी प्रखरपणे मांडली होती. वादग्रस्त कारभार समोर आणला होता.
अनेक दिवसांपासून राजकीय वरदहस्तामुळे ठाण मांडून बसलेले हे अधिकारी जिल्ह्यातून बाहेर जात नाही हे निदर्शनास आणून दिले होते. काही अधिकाऱ्यांवर चुकीचे शालार्थ आयडीचे ठपके ठेवण्यात येऊन चौकशी केली. नागपूर धर्तीवर अनेक बोगस शालार्थ आयडी नाशिक विभागातसुद्धा दिल्या गेल्याने शिक्षकांच्या बोगस भरत्या केल्याने उपसंचालक कार्यालयातील अधिकारीसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट असल्याने पूर्ण महाराष्ट्रभर मुद्दे गाजले होते.
याबाबतीत काही शिक्षण संस्थांवर खुद्द उपसंचालकांनी गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली होती. परंतु शिक्षण क्षेत्रातील याच अधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थाचालकांना हाताशी धरून मार्ग दाखवून अशी चुकीची कामे केल्याचे शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू होती. त्यात शिक्षण विभागाच्या अंतर्गत भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील काही नामांकित संस्थेमध्ये शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे संगनमत लक्षात आले होते. म्हणूनच त्यांची उचलबांगडी थेट गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात झाली. एवढ्या दू शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे एक शिक्षाच समजली जाते. त्यामुळे झालेल्या बदल्या हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. मात्र, हे करताना काही प्रामाणिक अधिकाऱ्यांचाही बळी गेल्याने शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांत नाराजी आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, नंदुरबारला बदल्या करून चांगलाच धक्का दिला आहे. नाशिकला फक्त रत्नागिरीहून प्रीती पवार या वेतन पथकात येत आहेत.
अधिकाऱ्यांची देवाणघेवाण करणारे राहिले ‘जैसे थे’च
भ्रष्ट कारभाराविषयी अधिकाऱ्यांचा खांदेपालट झाले असली तरी अधिकाऱ्यांची देवाणघेवाण करणारे मात्र ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे नवीन आलेल्या अधिकाऱ्यांची देवाणघेवाण पुन्हा सुरू होईल. पुन्हा तेच पाढे याठिकाणी होत राहतील. त्यासाठी अशा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी मंत्री भुसे यांनी करावी, अशी चर्चा शिक्षकांमधून होत आहे.