साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील राजमल लखीचंद ज्व्ोलर्स समुहाच्या राज्यभरातील सहा ते सात फर्मवर ईडीने छापे टाकून कारवाई केली. सलग दोन दिवस साठ अधिकारी तपासणी करीत होते. शनिवारी सकाळ पर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईत ९० लाखाची रोकड आणि विक्रीसाठी असलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ईडीने या फर्मचे मालक, माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांच्या पत्नी, माजी आमदार मनिष जैन, त्यांच्या पत्नी अशा चौघांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे या सर्वांना ईडी कार्यालयात चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
चौकशीला सामोरे जाऊ : ईश्वरलाल जैन
या कारवाईनंतर राजमल लखीचंद ज्व्ोलर्स समुहाचे मालक ईश्वर जैन म्हणाले की, ईडीची कारवाई चुकीची असून न्यायासाठी आम्ही कायदेशीर लढा देऊ. आमची १६८ वर्षांची तपश्चर्या वाया जाणार नाही. ज्व्ोलर्स उद्योग समूह मित्र, हितिंचतकांच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने सुरू करू, असा विश्वासही ईश्वर जैन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आम्ही काही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे समन्स बजावल्यानुसार चौकशीला सामोरे जाणार आहोत. राजकीय दबावतून ही कारवाई झाली असे मला वाटत नाही. कारण तसा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे विना पुरावा आरोप करणे उचित होणार नाही, असेही ईश्वरलाल जैन यांनी स्पष्ट केले आहे.