नागरिकांनी मानले आमदारांसह संबंधितांचे आभार
साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :
येथील गौसिया नगर, मदीना नगर, जिलानी नगर, मोहम्मदीया नगर भागातील कमी क्षमतेच्या वीजेच्या डीपीमुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे समस्याग्रस्त जनतेने समस्या सुटावी, या हेतूने माजी नगरसेवक फिरोज खान यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक वीज महावितरणाच्या कार्यालयात मोर्चा धडकला होता. यावेळी कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता आणि अभियंता यांच्याशी या भागातील लोकांच्या समस्येवर सविस्तर चर्चा केल्यानंतर यासंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर या भागातील रहिवाशांची समस्यांची जाण ठेवून लगेचच मुख्य अभियंत्यांशी तसेच जळगाव येथील मुख्य अभियंत्यांशी आ.चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. या भागात त्वरित २०० केव्हीची डीपी बसविण्याचे आदेश दिले होते. लवकरच डीपी बसविण्यात येईल, असे जनतेला आश्वासन दिले होते. त्यानंतर वीज महावितरण विभागाने विलंब न करता त्याठिकाणी २०० केव्हीची डीपी बसविली. त्यामुळे नागरिकांनी आ.चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी नगरसेवक फिरोज खान पठाण तसेच वीज महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
रहिवासी भागांसाठी फक्त १०० केव्हीची विजेची डीपी लावण्यात आली होती. त्याच्यावर दोन कुपनलिकेचा भार होता. त्यामुळे ही डीपी दोनवेळा जाळल्याने पुन्हा हेच प्रकार घडू नये, म्हणून या कुपनलिकांचे कनेक्शन वीज महावितरणकडून खंडित केले होते. त्यामुळे या भागांचा ठप्प झालेला पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होण्यासाठी महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे पदाधिकारी फरीद शेख, युसूफ शाह यांनी वीज महावितरण विभागात जाऊन चर्चा केली. त्यानंतर लाईनमन यांनी खंडित कनेक्शनची जोडणी केली.
जिलानी नगरात पाणीटंचाई का ?
त्याठिकाणी २०० केव्हीची डीपी लवकर न दिल्यास हा प्रकार थेट आ.चंद्रकांत पाटील यांना भेटून सांगण्यात येईल. असे सांगताच एका आठवड्यात डीपी बसविली जाईल, असे आश्वासन वीज महावितरणाच्या अभियंत्यांनी दिले होते. सध्या डीपी बसूनही कुपनलिकापासून हाकेच्या अंतरावरील जिलानी नगरात पाणीटंचाई का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भातही महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची समस्यांचे निवारण करण्यासाठी भेट घेतली होती.