मुंबई ः प्रतिनिधी
दिड वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. तेव्हापासून शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे व टोलेबाजीचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या इंडिया आघाडीची बैठक चालू आहे.या बैठकीवरून शिंदे गटाच मंत्री दीपक केसरकर यांनी खोचक शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे तसेच त्यांनी अजित पवारांचाही उल्लेख केला आहे.
काय म्हणाले होते केसरकर?
इंडिया आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करणाऱ्या काँग्रेससोबत सध्या ठाकरे गट बसल्याचा मुद्दा उपस्थित करत दीपक केसरकरांनी टीका केली होती. “बाळासाहेबांच्या मुंबईत चालू असलेली लाचारी आम्हाला मान्य नाही.सध्या जे चालू आहे ती लाचारी तुम्हाला मान्य आहे का? हा आमचा सवाल आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले होते.
दरम्यान, दीपक केसरकरांच्या टीकेवर पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारेंनी खोचक टीका केली आहे. “केसरकर म्हणतायत हा महाराष्ट्र आम्ही लाचार होऊ देणार नाही. पण लाचार व स्वाभिमान हे शब्द आपल्या तोंडून शोभतात का हो? आम्ही राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही असे म्हणत तुम्ही इथून गेलात.अजित पवारांनी जेव्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या गाडीमागे तुम्ही पळत सुटलेले दिसलात. त्याला लाचारी म्हणतात की, स्वाभिमान म्हणतात हे तुम्ही एकदा सांगितले पाहिजे. ते शुक शुक केल्यावर पळतात तसे पळत होतात तुम्ही गाडीच्या मागे. तेव्हा केसरकर तुम्हाला कसं वाटलं बरं?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.