भुसावळच्या तरुणीचा जागीच अंत
साईमत/ जळगाव (नशिराबाद)/प्रतिनिधी–
जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कारचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात भुसावळ येथील २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. नशिराबादजवळील टोलनाक्याजवळ गुरुवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात कारमधील एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळच्या दिशेने निघालेली इनोव्हा कार (क्र. एमएच १९ बीयू ७१८६) नशिराबादजवळील टोलनाक्याजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेगात असलेली कार महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) तोडून थेट विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत शिरली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कंटेनरला (क्र. जीजे ०१ डीएक्स ९४९७) ती जोरात धडकली. धडकेचा आवाज एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात कारमध्ये प्रवास करत असलेल्या झोया नदीम पठाण (वय २२, रा. भुसावळ) या तरुणीला गंभीर दुखापत झाली असून तिचा जागीच मृत्यू झाला. तर भुसावळ येथील प्रसिद्ध ‘सोना डेअरी’चे संचालक यांच्या मुलगा अरबान खान (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, नशिराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
ऐन रात्री महामार्गावर घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वेग आणि निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा एका तरुणीचा जीव गमवावा लागल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
