कारच्या भीषण अपघातात जळगावचे दोन तरुण जागीच ठार, पाच जखमी
साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :
पाचोरा ते जळगाव महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ मंगळवार दि. ५ रोजी मध्यरात्री सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात जळगाव शहरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तात्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास पाचोरा–जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ हा भीषण अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी तीव्र होती की कार दोन ते तीन वेळा पलटी झाली आणि वाहनाचा मोठ्या प्रमाणावर चुराडा झाला. या अपघातात श्रीरंग सुरेश पाटील (वय २७, रा. पिंप्राळा, जळगाव) आणि प्रसन्न रवींद्र निमजे (वय २१, रा. पिंप्राळा, जळगाव) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
मृत श्रीरंग पाटील यांचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. श्रीरंग हे पाटील कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या वडिलांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात रोहित सोनार (वय २३) हा तरुण गंभीर जखमी असून त्यास पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तसेच निखिल कच्छवा (वय २५), अनिकेत कोळी (वय २२), निलेश वाघ (वय २३) सर्व रा. पिंप्राळा, जळगाव हे जखमी असून त्यांच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कारचा दरवाजा अडकून बसल्याने मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते. रुग्णवाहिका चालकांनी कारचा पत्रा तोडून मोठ्या शिताफीने मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, अपघातानंतर कारचे रेडिएटर अत्यंत गरम झाल्याने वाहनाला आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत वाहनावर पाणी टाकून संभाव्य आग टाळली.
अपघातातील जखमींना तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. सागर गरुड यांनी कोणताही विलंब न करता त्वरित उपचार सुरू केल्याने काही जखमींचे प्राण वाचले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, भागवत पाटील, गोलू पाटील व किशोर लोहार यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी गजानन जोशी, दिलीप पाटील, दिलीप वाघमोडे, अशोक पाटील, वाशिम शेख व गजानन देशमुख यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.
