परिसरातील रहिवाशांतर्फे मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या विरोधात लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी आदी परिसरातील रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त निर्मला गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देतेवेळी तेजस श्रीश्रीमाळ, प्रसन्ना बागूल, निलेश चव्हाण, जितू परदेशी, विक्की महाले, उमेश कोळी, कैलास चौधरी, संकेत बागुल, गौरव नाथ, उषाबाई चौधरी, लताबाई जोशी, आशा सोनवणे, सुनिता परदेशी, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत आ.सुरेश भोळे यांनाही देण्यात आली. याविषयी रहिवाश्यांच्या भावना लक्षात घेता त्यांनी आयुक्तांशी दूरध्वनीवर चर्चा करून कचरा केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
जळगाव मनपातर्फे सम्राट कॉलनी, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, वडेश्वर महादेव मंदिराजवळ कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात येणार होते. कचरा संकलन केंद्राने परिसरातील रहिवाश्यांना दुर्गंधी व सांडणाऱ्या कचऱ्याचा सामना करावा लागेल. तसेच त्यांचे आरोग्याने धोक्यात येऊ शकते. हा परिसर हा दाट वस्तीचा आहे. त्याच्या बाजूलाच अंगणवाडी शाळेसह रहिवास परिसर आहे. सर्वांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होईल, हे लक्षात घेऊन मनपाने कचरा केंद्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करावे, अशा आशयाचे निवेदन अतिरिक्त आयुक्त निर्मला गायकवाड यांना परिसरातील नागरिकांनी दिले.
