जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे यांची माहिती
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे एका अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर प्राप्त झाली होती. त्यानुसार त्वरित कारवाई करुन अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी दिली.
चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर धुळे येथे ५ मे रोजी भाटपुरा येथे १६ वर्ष वय असलेल्या अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याबाबत बालविवाहाचे गांभीर्य जाणून तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन, धुळे येथील सुपरवायझर महेंद्र चव्हाण, केसवर्कर संदीप पवार यांच्या मदतीने भाटपुरा गावातील बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका यांना याप्रकरणाची त्वरित माहिती देण्यात आली. तसेच डायल नंबर ११२ क्रमांकावर थाळनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधुन तात्काळ येथे होणारा बालविवाह रोखण्यात आला.
भाटपुरा गावातील ग्रामसेवक आणि स्थानिक यंत्रणांनी बालविवाह रोखण्याच्या प्रयत्न केल्यावर त्यांना विरोध करण्यात आला. परंतू, पोलीस विभागाने या प्रकरणात हस्तक्षेप करुन बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार बालविवाह घडवून आणेल अथवा त्यास प्रोत्साहन देईल, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी दिल्यावर दोन्ही कुटुंब विवाह थांबविण्यास तयार झाले. त्यानंतर कुटूंबियांना बाल कल्याण समिती, धुळे यांच्या समक्ष उपस्थित करुन बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ याबाबत बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे, सदस्य प्रा. सुरेखा पाटील, सदस्य अॅड. अनिता भांबरे यांनी समुपदेशन केले. तसेच पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत १८ वर्ष वयाची होत नाही, तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’ असे हमीपत्र लिहून मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला.
यांचे लाभले मार्गदर्शन
यावेळी ग्रामसेवक एम.एस.पेंढारकर, पोलीस पाटील एकनाथ राठोड, सरपंच श्रावण चव्हाण, अंगणवाडी सेविका, चाईल्ड हेल्पलाईनचे सुपरवायझर महेंद्र चव्हाण, केसवर्कर संदीप पवार यांनी कामकाज पाहिले. यासाठी त्यांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर यांचे मार्गदर्शन लाभले.
टोल फ्री क्र. १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्ह्यात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यावर चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्र. १०९८ वर संपर्क करावा. संपर्क करणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.