साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी खान्देशी गीत मनोहर आंधळे लिखित ‘चला… चला… मतदान करू चला…’ गायिले होते. ते चर्चेत राहिले. याबद्दल नुकताच त्यांचा जळगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित सोहळ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
धनराळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्यासोबत मतदान जनजागृतीसाठी सायकल फेरीचे आयोजन करून ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला. यानंतर ‘चला… चला… मतदान करू चला…’ गीत सादर केले होते. ते राज्यभर पोहोचले. दरम्यान, या गीतावर लग्नाच्या अनेक ठिकाणी वरातीतही वऱ्हाडी मंडळींनी ठेका धरला. सोशल मीडियाच्या माध्यमामुळे गाणे सर्वत्र पोहोचले. गेल्या २० दिवसात या गाण्याला १० हजार व्ह्यूज मिळाले आहेत.