साईमत / नाशिक / प्रतिनिधी
चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त सप्तशृंगगड येथे होणाऱ्या यात्रेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने व्यापक नियोजन केले असून, एकूण २५० जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी निमाणी बसस्थानकातून दर १५ मिनिटांनी, तर नांदुरी पायथ्यापासून दर ५ मिनिटांनी गडाकडे बस सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या धार्मिक सोहळ्यासाठी गडावर येत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. ३ एप्रिलपर्यंत ही अतिरिक्त बससेवा सुरू राहणार असून, निमाणी, नांदुरी पायथा आणि गड वाहनतळ येथे यात्रा वाहतूक केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच मालेगाव, मनमाड, सटाणा आणि नांदगाव येथूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
गडासाठी बस नियोजन :
नांदुरी – १२०
मालेगाव – ४५
मनमाड – १५
निमाणी – ६५
सटाणा – ०५
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अल्पदरात निवास व्यवस्था, शिवालय तीर्थ येथे मोठे निवारा मंडप, ई-टॉयलेट, पाणपोई तसेच चप्पल स्टँडची सोय करण्यात आली आहे. अखंड वीजपुरवठ्यासाठी तीन जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून, गड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यात्रेच्या कालावधीत (२६ मार्च ते ३ एप्रिल) गडावर खासगी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून, नांदुरी येथून केवळ एसटी बसद्वारेच भाविकांची ने-आण केली जात आहे. गडापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.
