साईमत : जळगाव : प्रतिनिधी
निर्भेळ निकोप आणि डोळस श्रद्धेने पावन झालेले वातावरण प्रत्येक गणेश मंडळाकडून अनुभवास येणेसाठी गणरायांचा मंगलमय सण शांततेत इको फ्रेंडली साजरा करत पोलीस खाते, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पवन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना समाजाने एकसंघ व्हावे, संघटित होऊन लोकांमध्ये एकता आणली जावी हे उद्दिष्ट ठेवले होते तेच आपण विसरत आहोत. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे व पर्यावरणाची होणारी हानी याचा विचार स्वतः करावा. प्रत्येकाला प्लास्टर ऑफ पॅरिस आणि थर्माकोल यामुळे पर्यावरणाची होणाऱ्या नुकसानाची माहिती आहे. मग ती चूक सातत्याने दरवर्षी केली जाते त्यात बदल व्हावा तसेच उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते याचा त्रास अन्य मंडळासह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागतो.
आरोग्यास घातक असणाऱ्या गोष्टींचे उदात्तीकरण यामुळे होत आहे आहे.अनेक लाखो खेडी आजही अंधारात असताना आपण विद्युत रोषणाईचा जास्त वापर करतो. अनेक सामाजिक उपक्रम राबवणारी मंडळे, झगमगाठ, देखावे रोषणाई ,ढोल- ताशे यावर पैसा उधळत असतात तर त्याबाबत विचार व्हावा. पर्यावरणास घातक ठरणाऱ्या गोष्टींचा वापर देखाव्यात होऊ लागला आहे. बाप्पा प्रति असलेल्या श्रद्धेला तिलांजली देत उत्सवाला बाजारी स्वरूप दिले जात आहे. काही मंडळांनी आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन न करता अनावश्यक खर्चाला कात्री लावा, म्हणजेच वाचलेल्या रकमेतून गरीब अनाथ व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा आणि आरोग्या, शिक्षण याकडे वळवा म्हणजे देणगीदारांनाही मदत सत्कारणी लागल्याचे आनंद होईल. तसेच बाप्पांची मूर्ती मर्यादित असेल तर स्थापनेस व विसर्जनात त्रास होत नाही. मोठ्या मूर्तीमुळे विसर्जनानंतर विटंबना सुद्धा होऊ शकते ती आपल्याला टाळता येईल.
त्याकरिता पर्यावरण पूरक इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ विलास नारखेडे, रघुनाथ राणे, सचिन भोळे, लीलाधर नारखेडे, सुधाकर सपके, किसन गवळी, कैलास भोळे, पवन नारखेडे, मनोज पाटील आदींनी केली आहे.