साईमत /जळगाव / प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची महार वतनाची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, हे प्रकरण २००२ सालातील असून भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ मधील जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे व त्यांच्या वारसांच्या मालकीची होती. या परिसरात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ सुरू करण्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी संबंधित जमीन खरेदीची तयारी दर्शवली होती. यावेळी योग्य मोबदला तसेच कुटुंबातील सदस्यांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत ५१ हजार रुपये आगाऊ देऊन घरातील सदस्यांचे अंगठे घेण्यात आले आणि बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र अनेक वर्षांनंतरही त्या ठिकाणी साखर कारखाना उभारण्यात आला नाही.
दरम्यान, २०२५ मध्ये जमिनीची माहिती काढल्यानंतर संबंधित जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदीखताची प्रत तपासताना त्यात फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला. खरेदीखतातील ‘तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ या नावाऐवजी खाडाखोड करून ‘शारदा एकनाथ खडसे’ असे नाव टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी तायडे कुटुंबीयांनी रिपाइं (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
