साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथे जनावरांचे चामडे व हाडे घेवून जाणाऱ्या ट्रक जाळल्याची घटना गुरूवारी घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी धरणगाव पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी मालवाहू ट्रक (क्र. युपी ९३, एटी ८१३५) हा जनावरांची कातडे भरुन ट्रक चालक सल्लू खान बाबू खान व क्लिनर मानसिंग श्रीराम कुशवाह हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथे लेदर फॅक्टरी येथे प्रक्रियेकरीता घेवून जात होते. त्यावेळी धरणगाव तालुक्यातील बांभोरीजवळ काही जणांनी ट्रकचा पाठलाग करुन पाळधी येथे थांबवून जमाव जमविला होता. तेव्हा पोलिसांनी जमावाला कायदा हातात न घेता कायदेशीर कारवाई करण्याविषयीचे आवाहन केले होते. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून ट्रकमधील कातड्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविले. त्या ठिकाणी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक करून पोलीस वाहनांची तोडफोड केली. तसेच ट्रक चालक व क्लिनर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच मालवाहू ट्रक पेटवून दिला. त्यावेळी पोलिसांनी ट्रक चालक व क्लिनरचा जीव वाचवून अग्नीशमन दलाच्या मदतीने ट्रक विझविला.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये यांचा आहे समावेश
याप्रकरणी अक्षय तंटू अहिरे, भूषण पावबा पाटील, मयूर अनिल पाटील, जनार्दन गुलाब सोनवणे, विकास राजेंद्र सोनवणे, रामेश्वर भगवान माळी, सोपान कोळी, पंकज लोटन चौधरी, रत्नदीप मनोज नन्नवरे, सुशील संजय नन्नवरे, सागर जितेंद्र नन्नवरे, रूपेश प्रभाकर माळी, गोपाल सुरेश चौधरी, भगवान सोमनाथ पाटील, समाधान चेतन कोळी (सर्व रा. पाळधी, ता.धरणगाव) तसेच धिरज कोळी, गुलाब नन्नवरे, सोपान नन्नवरे, प्रमोद युवरात कोळी सर्व (रा. बांभोरी, ता.धरणगाव) अशा १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.