साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंदपर्यंत तितूर नदीवर असलेला पूल कमी उंचीचा असल्याने तितूर डोंगरी नदीला पावसाळ्यात पूर आल्यास नदीपलीकडील अर्ध्या गावाचा संपर्क तुटून जातो. शहराच्या घाट रोडवरील भागातील जनजीवन विस्कळीत होते. म्हणून तितूर नदीवर जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचा पूल बनविण्यात यावा. तसेच चामुंडामाता मंदिराजवळील डोंगरी नदीवरील जुना पूल जीर्ण झाला आहे. तेथे नवीन पूल बांधावा, अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे रयत सेनेच्यावतीने गुरुवारी, १ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंदपर्यंत तितूर नदीवर असलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने तितूर डोंगरी नदीला पावसाळ्यात पूर आल्यास नदीपलीकडील अर्ध्या गावाचा संपर्क तुटून जातो. शहराच्या घाट रोडवरील भागातील जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे घाट रोड पलीकडील नागरिकांचे तहसील कार्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, रुग्णालयात आदी भागात येणे बंद होते. अशा परिस्थितीत जर एखाद्या नागरिकाच्या प्रकृतीची समस्या उद्भविल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होते. शहराच्या मुख्य परिसरात सर्व रुग्णालय आहेत. तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, शाळा महाविद्यालयही याच भागात असल्यामुळे घाट रोड परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना तितूर नदीला आलेल्या पुरामुळे मुख्य शहरात येण्यास अडचणी निर्माण होते. त्यामुळे हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंदपर्यंत तितूर नदीवर चाळीसगाव नगरपरिषदेच्यावतीने नवीन पूल बांधण्यात यावा. नदीपलीकडील नागरिकांचा संपर्क शहराच्या मुख्य भागाशी राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे.
पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता
पुलाचे काम सुरु केल्यास पर्यायाने वाहतूक हिरापूर रस्त्यावरून तिरंगा पूल ते चामुंडामाता मंदिरजवळील पुलावरून वळवावी लागते. मात्र, चामुंडा माता मंदिराजवळ असलेला पूल हा जुना व जीर्ण झाल्याने त्यावरून अवजड व सतत वाहतूक झाल्यास तो पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणून हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंदपर्यंत तितूर नदीवर पूल बांधण्याअगोदर पाटीलवाडा रिंगरोड चामुंडा माता मंदिराजवळील डोंगरी नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे तो नवीन बांधण्यात यावा. त्यामुळे घाट रोडवरील वाहतूक या रोडने वळविण्यास वाहतूक प्रशासनाला सोयीचे होईल. म्हणून लवकरात लवकर चामुंडा माता मंदिराजवळील डोंगरी नदीवरील पूल नवीन बांधण्याची मागणी रयत सेनेच्यावतीने चाळीसगाव नगरपरिषदेकडे केली आहे.
आंदोलनाचा इशारा
ही मागणी लोकहितासाठी असून येत्या १ महिन्यात रिंग रोड येथील डोंगरी नदीवरील पूल नवीन बांधण्यात यावा. अन्यथा रयत सेनेच्यावतीने रिंग रोडवरील पुलाचे भुमिपूजन करून आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगर परिषदेचे मुख्याधिकारी व न. पा. प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती चाळीसगाव विधानसभेचे आमदार, जळगाव मतदारसंघाचे खासदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्वर कोल्हे, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे अध्यक्ष खुशाल पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, दिनेश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहराध्यक्ष छोटू अहिरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर संघटक दीपक देशमुख, ज्ञानेश्वर सोनार, रोहित गायकवाड, श्रीकांत तांबे, किरण शेवरे, शिवाजी गवळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
