अपहरणाच्या संशयातून जमावाचा क्रूर न्याय; अव्हाणे शिवारात अनोळखी तरुणाची हत्या
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात अपहरणाच्या संशयावरून एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली असून मंगळवारी, २४ फेब्रुवारी रोजी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनींग परिसरात सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. परिसरात राहणारे मनोहर भगवान सोनवणे यांचा तीन वर्षीय मुलगा विराट उर्फ लकी याला तो उचलून नेत असल्याचा संशय काहींना आला. या संशयावरून परिसरातील काही नागरिकांनी त्या तरुणाला पकडले.
घटनेचे गांभीर्य न लक्षात घेता आणि कोणतीही खातरजमा न करता जमावाने संबंधित तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांसह काठ्यांनीही मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळातच तो तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला.
दरम्यान, अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्यास दिली. पोलीस ठाणे अंमलदार सूर्यकांत नाईक यांच्या सूचनेनुसार बीट अंमलदार श्रीकांत धनराज बदर व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली होती. संबंधित तरुणाच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव होत होता तसेच डोके, हात व पायांना गंभीर दुखापत झाली होती.
पोलिसांनी तत्काळ जखमी तरुणाला शासकीय वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अत्यंत गंभीर दुखापतीमुळे तो शुद्धीवर आला नाही. उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खु.), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, सध्या रा. सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोघे रा. बामणोद, ता. यावल) आणि अफताब आरिफ खाटीक (रा. जळगाव) यांना ताब्यात घेतले आहे. यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, केवळ संशयाच्या आधारे कायदा हातात घेतल्याने एका व्यक्तीचा बळी गेल्याची ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे. नागरिकांनी अफवा आणि संशयांवर विश्वास न ठेवता तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
